BIG BREAKING - तर पालखीचा इंदापूर मुक्काम रद्द करून पुढे जाऊ - देहू संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांचे मोठे वक्तव्य

मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क

इंदापूर (२० जून) :- इंदापूर शहरातील पालखी मुक्कामाची जागा बदलण्यावरून इंदापूरचे ग्रामस्थ आक्रमक झाले असताना देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पालखीच्या मुक्काम स्थळावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमधील वाद वेळीच मिटला नाही तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा इंदापूर शहरातील नियोजित मुक्काम आम्हाला रद्द करून पुढे जावे लागेल असे त्यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना म्हटले आहे. असे झाल्यास ही इंदापूरच्या इतिहासाला न शोभणारी व इंदापूरकरांसाठी खूप लाजिरवाणी गोष्ट ठरणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात लवकर तोडगा निघणे महत्वाचे ठरणार आहे.

दोन वर्षांच्या कोरोना संकटानंतर जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी २ आणि ३ जुलै रोजी इंदापूर मुक्कामी येत आहे. मात्र प्रशासनाने पालखीच्या मुक्कामाची जागा बदलल्याने प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास मंगळवारी (२१ जून) रास्ता रोको, गुरूवारी (२३ जून) इंदापूर तहसील कचेरी समोर लाक्षणिक उपोषण, रविवारी (२६ जून) तहसील कचेरीवर मोर्चा, तर शेवटच्या टप्प्यात पालखी मुक्कामी असताना (२ आणि ३ जुलै) इंदापूर शहर बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

तहसीलदार श्रीकांत पाटील यांना मागणीचे निवेदन देताना ग्रामस्थ
देहूमधून आज (२० जून) पालखीचे प्रस्थान झाले असताना प्रशासन आणि इंदापूरच्या ग्रामस्थांमधील वादावर देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानाचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालखीचे नियोजन आज झालेले नसून, पालखीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत ग्रामस्थांनी प्रशासनाला का नाही कळवलं? नव्या पालखी स्थळावर शासन प्रशासन कोट्यवधींचा खर्च करत असताना ग्रामस्थांनी ते का नाही थांबवलं? असे अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी दिवसेंदिवस वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याचे सांगत, पालखीचा रथ इंदापूर शहरातील ज्या भागातून जातो तो भाग अरुंद असल्याचे म्हटले आहे.

प्रशासन आणि इंदापूरचे ग्रामस्थ यांच्यातील वादाची कल्पना आधीच असती तर पालखीच्या नियोजनात आम्ही बदल केला असता असे नितीन महाराज मोरे यांनी म्हटले असून, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात वेळीच तोडगा न निघाल्यास आम्हाला इंदापूर शहरातील पालखीचा नियोजित मुक्काम रद्द करून पुढे जावे लागेल असे मोठे विधान त्यांनी मुत्सुद्देगिरीशी बोलताना केले आहे. या त्यांच्या मोठ्या वक्तव्यानंतर प्रशासन आणि ग्रामस्थ आता यावर काय भूमिका घेणार हे बघावे लागणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इंदापूरच्या बाजारपेठेत वयस्कर महिलेला लोखंडी रॉडने मारहाण; तिघा युवकांच्या विरोधात गुन्हा दाखल

पालक व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम २००७

भरणेंच्या आमदारकीच्या हॅट्रिकची संभाव्य संधी हुकवणाऱ्या समीकरणांचे ऑडिट