शेतकऱ्यांच्या सत्याग्रहापुढे अहंकारी सत्ताधाऱ्यांना अखेर झुकावे लागले - स्वप्नील सावंत
इंदापूर (१९ नोव्हेंबर) :- मागील अनेक महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या सत्याग्रही आंदोलनाला अखेर आज यश आले. हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा आज खुद्द प्रधानमंत्र्यांनी केली असून, त्यांनी देशाची माफीही मागितली आहे. आता याबाबत विविध स्तरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असून, देशाच्या अन्नदात्यांनी लोकशाही पध्दतीने केलेल्या सत्याग्रहापुढे अहंकारी सत्ताधाऱ्यांना अखेर झुकावे लागल्याचे मत इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता लागू करण्यात आलेले हे तिन काळे कायदे रद्द व्हावेत यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध स्तरावर आंदोलन करण्यात आले होते. इंदापूर तालुक्यात देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले होते. या मागणीला यश आल्याने
हा खऱ्या अर्थाने सर्व आंदोलन करणार्या शेतकऱ्यांचा विजय आहे. यामुळे भाजपच्या शासनकाळात दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेल्या लोकशाहीला नक्कीच बळकटी मिळणार असल्याचे मत स्वप्नील सावंत यांनी व्यक्त केले आहे.
कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना न्याय मिळायला एवढा वेळ लावला ही दुर्दैवी बाब आहे. आंदोलनाला विविध प्रकारे बदनाम करण्यात आले, लखीमपूरसारख्या घटनाही घडवण्यात आल्या. मात्र शेतकरी झुकला नाही, डगमगला नाही. लढला. शेवटी अहंकारी सत्ताधाऱ्यांना झुकावे लागले. माफी मागावी लागली. या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले राहुल गांधी व काँग्रेस पक्ष यापुढेही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील. कारण काँग्रेस हा सामान्यांचा, गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा पक्ष आहे असे नमूद करताना स्वप्नील सावंत यांनी, 'जय हिंद, जय हिंद का किसान' असे म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा