इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समिकरणांच्या उलथापालथीचे संकेत
२०१९ पासून काँग्रेसकडे पाठ फिरवलेल्या इंदापूरच्या नगराध्यक्षांनी अखेर काँग्रेसच्या कार्यक्रमाला बुधवारी (१९ मे) हजेरी लावली. या कार्यक्रमाला कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना नाष्टा वाटप हा सामाजिक टच असला तरी भूतकाळातील घडामोडी पाहता नगराध्यक्षांनी लावलेल्या या हजेरीचा राजकीय अर्थ लावला जाणे साहजिक असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीमध्ये राजकीय समिकरणांची उलथापालथ पहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे. सध्या इंदापूर नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. इंदापूरचे नगराध्यक्ष आणि सत्ता काँग्रेसचीच असल्याचे काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी अनेकवेळा म्हटले असले तरी, सप्टेंबर २०१९ पासून नगरपरिषदेवर हर्षवर्धन पाटील समर्थक गटाची सत्ता असल्याची बाब त्यांना माहीत नसावी हे शक्य नाही.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सोयीनुसार भूमिका घेत नगराध्यक्षांसह इंदापूर नगरपरिषदेचा सत्ताधारी गट काँग्रेसमध्येच राहिला. असे असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर हा गट काँग्रेसच्या झेंड्याखाली कधीही दिसला नाही. विशेष म्हणजे नगराध्यक्षांसह काँग्रेसच्या संपूर्ण सत्ताधारी गटाने विधानसभा निवडणुकीत उघडपणे हर्षवर्धन पाटील यांचा अर्थातच भाजपचा प्रचार केला होता. पक्षाशी उघडउघड बंडखोरीनंतरही नगराध्यक्ष आणि सत्ता दोन्ही आमचीच या समाधानापायी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी या गटावर कारवाई करण्याचे धाडस आजतागायत दाखवलेले नाही. तर पाटील यांच्या पराभवानंतर या सत्ताधारी गटातही दोन गट पडल्याचे सर्वांना ठाऊक असून, मागील काही घडामोडी पाहता शहा कुटुंबासह एक गट येत्या नगरपरिषद निवडणुकीत वेगळी भूमिका घेईल अशी शक्यता नाकारता येत नाही.
वरील घडामोडी पाहता नगराध्यक्षा अंकिता शहा यांची काँग्रेसच्या कार्यक्रमाला हजेरी निश्चितच आगामी निवडणुकीत वेगळ्या राजकीय समिकरणांचे संकेत देणारी आहे. या सर्व घडामोडीनंतर मुळ काँग्रेसी स्वभावाचे शहा कुटुंब आगामी नगरपरिषद निवडणुक कमळावर लढतील याबाबत शंका आहे. उशिरा का होईना मात्र काँग्रेसची वाट धरतात, काही अटींसह राष्ट्रवादीच्या गोठात जातात, का सत्ताधारीतील काही व विरोधकांतील काही अशी स्वतंत्र तिसरी आघाडी स्थापन करतात हे पाहावे लागणार आहे. एकंदरीत नगराध्यक्षांसाठी सर्व पर्याय खुले आहेत. परंतु वरील घडामोडी म्हणजे, इंदापूरची जनता भाजपला कितपत स्वीकारेल याबाबत साशंकता असल्याने नगरपरिषद निवडणुकीआधी पाटील-शहा यांच्या रणनीतीचाच हा एक भाग आहे असाही एक मतप्रवाह इंदापूरकरांमध्ये आहे. असो नसो मात्र यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समिकरणांमध्ये बरीच उलथापालथ दिसेल हे नक्की.



शेवटची टिप्पनी म्हणजे मूळ मुद्द्याला हात घातल्या सारखी आहे
उत्तर द्याहटवा