दसऱ्याच्या दिवशी झालेल्या अपघातातील आरोपी ट्रक चालकाला इंदापूर न्यायालयाकडून जामीन
आरोपीच्या वतीने ॲड. अक्रम आसिफ शेख यांनी बाजू मांडली
मुत्सुद्देगिरी न्यूज नेटवर्क
इंदापूर (२६ ऑक्टोबर) :- ऐन दसऱ्याच्या दिवशी इंदापूर शहरानजीक झालेल्या अपघातात दशरथ मारुती चोरमले (वय ५५ वर्ष, रा. काळखे वस्ती, गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली होती. मंगळवारी (२४ ऑक्टोबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर ट्रक चालक प्रकाश हनुमंत भंवर (रा. निमगाव डाकू, ता. कर्जत, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली होती. रोहिदास बाळू चोरमले (रा. काळखे वस्ती, गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द. वि. ३०४ अ, २७९ सह विविध कलमांतर्गत बुधवारी (२४ ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आरोपीला इंदापूर दिवाणी व फौजदारी न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर, तथा तपास कार्यात सहकार्य करण्याच्या अटीवर अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी, अर्थात बुधवारी (२५ ऑक्टोबर) जामीन देत सुटका करण्यात आली. या प्रकरणात आरोपीच्या वतीने क्राईमसारख्या खटल्यांमध्ये हातखंडा असलेले, तथा इंदापूर शहरातील नावाजलेले वकील ॲड. अक्रम आसिफ शेख यांनी न्यायालयात बाजू मांडली.
अपघाताची पार्श्वभूमी - इंदापूर शहरात दूध विक्री करून, तथा दसऱ्यासाठी झेंडूची फुले आणि इतर साहित्य खरेदी करून दशरथ मारुती चोरमले आपल्या सी.डी. डिलक्स या दुचाकीवरून (एमएच ४२ सी ५६०४) घरी निघाले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एमएच ३२ एजे ९२७३) त्यांना चिरडले होते. ही दुर्दैवी घटना पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या मातोश्री हॉटेलच्या समोर घडली होती. हा अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीस्वाराच्या मेंदूसह शरीराचे अवयव घटनास्थळी अक्षरशः विखुरले होते. खरेदी केलेल्या वस्तूही रस्त्यावर अस्तव्यस्त पडल्या होत्या. या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा