इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा - भाजपा व महायुतीच्या घटकपक्षांची मागणी
अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.
प्रतिनिधी : समीर सय्यद
शनिवार (१९ सप्टेंबर) : भाजपा नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप व महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने इंदापूरच्या तहसिलदारांना आज (१९ सप्टेंबर) निवेदन देण्यात आले. अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या पिकांचे पंचनामे करून इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव यांनी हे निवेदन स्वीकारले.
सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यात सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, यामुळे ओढे, नाले, नदी यांना पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतक-यांच्या घरात तसेच शेतामध्ये पाणी साठले आहे, तर काही ठिकाणी अतीवृष्टीमुळे शेतजमीनी खचल्या असून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. शेतक-यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी साठले असून अतिरिक्त पाण्यामुळे डाळींब, द्राक्ष, केळी, पेरू आदी फळबागा तसेच ऊस, मका, आदि पिके आणि मका, कडवळ, या जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे. अगोदरच कोरोना महामारीच्या संकटामुळे पिकांना बाजारभाव नसलेला शेतकरी खचलेला, पिचलेला असताना अतिवृष्टीमुळे त्यांचे हातातील पिके आणि चाऱ्याचे नुकसान झाल्याने पशूधन तसेच दुग्ध व्यवसाय धोक्यात आलेला आहे. त्यामुळे शेतक-यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अतीवृष्टीमुळे जिथे जिथे पिकांचे, घरांचे, शेतजमीनींचे नुकसान झााले आहे, तिथे झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहिर करावी व शेतक-यांचे खात्यावर शासकिय मदतीची रक्कम जमा करावी. सध्या शेतक-यांच्या जमीनीमध्ये पाणी आहे तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील आणखी काही दिवस हे अतिवृष्टी ते मध्यम पावसाचे असून त्यामुळे शेतक-यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होणार असल्याने शासनस्तरावर ओला दुष्काळ जाहिर करावा. शासन स्तरावरून होणा-या सर्व वसुल्या तात्काळ थांबवाव्यात. पूरसदृष्य स्थिती निर्माण झाल्याने तसेच ठिकठिकाणी दलदल झाल्याने भविष्यात शेती पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन नुकसानीमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. तसेच गावांगावांमध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता असल्याने त्याबाबतीत आगोदरच शासकिय यंत्रणेने उपाय योजना कराव्यात जेणेकरून होणारा अनर्थ टाळता येईल, अशा विविध मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
या मागण्यांवर शासनाने त्वरीत उपाय योजना कराव्यात अन्यथा भाजप नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या आदेशाने इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे.
![]() |
| पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान |
या निवेदनावर इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, पुणे जिल्हा भाजपच्या मागासवर्गीय आघाडीचे उपाध्यक्ष नानासाहेब शेंडे, भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्ह्य सचिव तानाजी थोरात, भाजपा किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्राचे संघटक माऊली चवरे, जेष्ठ नेते मारुतीराव वनवे, जिल्हा भाजपचे शिवाजीराव तरंगे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके, भाजप युवा मोर्चाचे मोर्चाचे सचिन सावंत आदि पदाधिकार्यांच्या सह्या आहेत.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा